Friday, 12 December 2014

पोळी, पिझ्झा आणि प्रगती (संदीप वासलेकर)

I feel that this is very important post so posted it here in my blog for all visitors.
--------------------------------------------

दिवाळीत मुंबईच्या विलेपार्ले पूर्व भागात एका मित्राला भेटायला गेलो होतो. विलेपार्ले पूर्व हा भाग मराठी संस्कृतीचं माहेर समजला जातो. अनेक लेखक, कलाकार इथं राहतात. 
त्या विभागातल्या एका दुकानात मराठी पद्धतीचं घरगुती जेवण व खाद्यपदार्थ मिळतात असं मी ऐकलं होतं म्हणून तिकडं गेलो होतो. तिथं दुकानाच्या मालकीणबाई व दोन-चार कामगार दिसले; पण खाण्याचे पदार्थ काही दिसेनात. मी विचारलं तर त्या अभिमानाने म्हणाल्या ‘‘आम्ही हे मराठी पद्धतीचं घरगुती जेवण आणि खाद्यपदार्थ ठेवणं आता बंद केलं आहे...आम्ही आता इथं लवकरच पिझ्झा पार्लर सुरू आहोत.’’

हा अनुभव फक्त विलेपार्ल्यापुरता मर्यादित नाही. पुणे, नाशिक इथंही हे अनुभव आले आहेत. युरोपमध्ये सरकारदरबारी व इतर वर्तुळात पाहुण्याला पिझ्झा देणं हे कमीपणाचं लक्षण समजलं जातं; पण महाराष्ट्रात पिझ्झा हे एक उच्च मध्यमवर्गात प्रवेश केल्याचं प्रतीक समजलं जातं.

हा ‘पोळीपासून पिझ्झ्याकडं’ आपला होणारा प्रवास केवळ जेवण्याच्या ताटापुरताच मर्यादित नाही. मराठी समाजाला पछाडणारं आधुनिकतेचं भूत विविध स्वरूपांत पाहायला मिळत आहे. सुप्रसिद्ध अभिनेता अतुल कुलकर्णी यांनी एक अनुभव सांगितला होता. तो असा 
सातारा जिल्ह्यातील एका छोट्या खेड्यात देवळामध्ये विश्रांतीसाठी कुलकर्णी थांबले होते. ते सर्वपरिचित आणि प्रसिद्ध असल्यामुळं अनेक गावकरी त्यांच्याशी गप्पा मारायला आले. त्यापैकी काहींनी देवळाच्या जीर्णोद्धारासाठी कुलकर्णी यांच्याकडून आर्थिक मदतीची अपेक्षा केली.
ते देऊळ तसं सुंदर झाडांच्या छायेत चिरेबंदी दगडांनी बांधलेलं होतं. या देवळाची थोडीशी डागडुजी आणि सुशोभीकरण करायचं असेल, असं कुलकर्णी यांना वाटलं आणि ते सामाजिक जाणीव असलेले असल्यानं त्यांनी मदत देऊ केली; पण त्या ग्रामस्थांना ही अल्पशी मदत नको होती. ते चिरेबंदी देऊळ पाडून तिथं संगमरवरी दगडाचं देऊळ बांधावं, अशी त्यांची इच्छा होती. ‘आम्हालासुद्धा आधुनिक व्हायचंय. आम्हालाही समाजात वर यायचंय...’ असं त्यांचं म्हणणं होतं. ‘वर यायचं’ म्हणजे चिरेबंदी देऊळ पाडून राजस्थानातून महागडं संगमरवर आणायचं व आपली विहीर अस्वच्छ ठेवून पाणी पिण्यासाठी बिसलेरी बाटली विकत घ्यायची!

इथं उत्तम कांबळे यांनी ‘सप्तरंग’मधल्या ‘फिरस्ती’ या सदरातल्या एका लेखाची आठवण येते. मुंबईजवळच्या एका खासगी विद्यापीठाच्या आवारात कांबळे यांना महागड्या विदेशी गाड्या मोठ्या प्रमाणावर दिसल्या होत्या. त्या गाड्या त्या विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या होत्या आणि त्या विद्यार्थ्यांपैकी बरेचसे विद्यार्थी हे ग्रामीण भागातल्या जमिनी विकलेल्या शेतकऱ्याचे सुपुत्र होते. 

त्या फेरारी व मर्सिडिज गाड्या...ते संगमरवरी दगड... हे सगळं मराठी मानसिकतेची ‘पोळीपासून पिझ्झ्याकडं’ भरकटलेल्या प्रवासातली दृश्‍यं.  
अजूनही व्यवस्थित पाहिलं तर त्या दृश्‍यात आपल्याला बंद होणाऱ्या मराठी शाळा, उच्चभ्रू समाजासाठी इमारती बांधण्याकरिता जंगल व टेकड्या उद्‌ध्वस्त केल्यामुळं दरडीखाली नाहीसं झालेलं माळीण गाव व ‘व्हॉट्‌सॲप’वर विनोद पसरवण्यात मग्न झालेली सुशिक्षित मंडळी दिसतील.

************** 
लंडनमध्ये मेफेअर हा भाग सर्वांत श्रीमंत समजला जातो. तिथं अब्जाधीश राहतात. लक्षाधीश राहू शकत नाहीत. राहणारे केवळ ब्रिटिश लोकच आहेत असं नव्हे; तर  गडगंज श्रीमंत असलेले अरब शेख, चिनी उद्योगपती व रशियन गॅम्बलर हे सारे मेफेअरमध्ये राहतात. राणीचा बकिंगहॅम पॅलेस मेफेअरच्या एका टोकाशी आहे.

मी दिवाळीच्या काही दिवस आधी लंडनला कामासाठी गेलो होतो, तेव्हा मेफेअरला दुपारी उशिरा पोचलो. भूक खूप लागली होती. डोकं दुखायला सुरवात झाली होती. पटकन जेवलो नाही, तर पुढच्या मीटिंगमध्ये मी निष्प्रभ होईन, अशी भीती होती. मेफेअरमधली सगळी रेस्टॉरंट अतिशय महागडी असणार, याची मला खात्री होती. मी त्या भागात काम करणाऱ्या काही परिचितांना सल्ला विचारला. ते म्हणाले ‘‘या समोरच्या चार गल्ल्यांपैकी कोणत्याही गल्लीत जा. तुला ‘प्लोमॅन्स प्लॅटर’ अथवा ‘फिश आणि पीज्‌’ हे पारंपरिक ब्रिटिश पदार्थ अतिशय स्वस्तात मिळतील.’’

इंग्लंडमध्ये ‘प्लोमॅन्स प्लॅटर’ म्हणजे शेतकऱ्याची थाळी व फिश आणि उकडलेले हिरवेगार वाटाणे हे पारंपरिक पद्धतीनं तयार केलेलं जेवण अतिशय लोकप्रिय आहे. ते मेफेअर, नाईट्‌सब्रीज, वेस्टमिन्स्टर, सेंट जॉन्स वूड अशा सर्व प्रतिष्ठित वस्त्यांमध्ये प्रत्येक गल्ली-बोळात मिळतं. तेदेखील अगदी स्वस्तात. मी एका मित्राला विचारलं, तेव्हा तो म्हणाला ‘‘हे बघ, प्रतिष्ठा ही नवे वैज्ञानिक शोध लावून, राजकारणात नवे प्रवाह आणून, व्यापार-धंद्यात जगभर यश मिळवून, लेखन व कला यांत अभूतपूर्व कार्य करून मिळत असते. त्याचा राहत्या घराशी, ताटातल्या खाद्यपदार्थांशी, मित्रांच्या हुद्द्यांशी काय संबंध?’’

लंडनमध्ये जिथं संसदगृह आहे, त्याच्या समोरच ‘सेंट स्टीफन’ व ‘रेड लायन’ ही दोन आहारगृहं आहेत. बहुतेक संसदसदस्यांना तिथंच पारंपरिक ब्रिटिश पदार्थांवर ताव मारताना आपण दुपारी पाहू शकतो. अर्थात संसदेतली खानावळ अगदीच स्वस्त आहे. त्यामुळं बहुतेक मंत्री, लॉर्ड व खासदार त्या खानावळीत जाणं पसंत करतात; पण अगदीच बाहेर जायची वेळ आली, तर ते ‘सेंट स्टीफन’ अथवा ‘रेड लायन’मध्ये जाऊन प्लोमॅन्स प्लॅटर, शेफर्ड पाय, फिश व चिप्स अथवा पीज्‌ खातात.

लंडनमध्ये सर्वत्र हिरवेगार पट्टे आहेत. गेल्या अनेक शतकांत लंडननं खूप चढ-उतार पाहिले. काही शतकं मेफेअर व वेस्टमिन्स्टर या लंडनच्या दोन भागांतून ब्रिटननं जगभर राज्य केलं. आता लंडनवर अरबी, चिनी, रशियन श्रीमंत लोक राज्य करतात. भारतीय वंशाचे उद्योगपती व व्यावसायिकही अनेक आहेत; पण या अब्जाधीशांच्या इमारती बांधण्यासाठी लंडनमधलं कोणतंही उद्यान एखाद्या बिल्डरच्या हवाली केलं गेलं नाही. शिवाय, शहरात प्रत्येक मैलावर सुंदर हिरवळ असेल, हे कटाक्षानं पाहिलं जातं. जगाच्या राजकारणात एकेकाळी इंग्लंड ही एक महासत्ता होती व आता युरोपमध्येदेखील त्या देशाचं महत्त्व कमी झालेलं आहे. मात्र, लंडनची हिरवळ मात्र अनेक शतकांत श्रीमंत, बिल्डर, कंत्राटदार अशा लोकांपुढं नमली नाही!

मी लंडन ते ऑक्‍सफर्ड व ऑक्‍सफर्ड ते स्ट्रॅटफोर्ड (शेक्‍सपिअरचं जन्मस्थान) हा प्रवास अनेकदा केला आहे. तिथं चार-पाचशे वर्षं जुनी चर्च मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. चौकशी केल्यावर तिथले लोक त्या चर्चचा इतिहास अभिमानानं सांगतात. जुनी वास्तू चांगल्या अवस्थेत टिकवण्यासाठी काय प्रयत्न केले जातात, तेही ते आपुलकीनं सांगतात. कधी अतुल कुलकर्णी यांना तिथं घेऊन गेलो, तर ‘आम्हाला हे ६०० वर्षांचं जुनं चर्च पाडून इटलीतून संगमरवर आणून नवी वास्तू बांधण्याची इच्छा आहे,’ असं त्यांना कुणी सांगणार नाही आणि उत्तम कांबळे जर ऑक्‍सफर्ड अथवा केंब्रिज विद्यापीठात गेले, तर तिथं त्यांना राजघराण्यातली अब्जाधीश मंडळी, उद्योगपतींच्या कुटुंबातले लोक व मेफेअरसारख्या ठिकाणी राहणारे अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनी दिसतील; पण त्यांना ऑस्टिन, मार्टिन, फेरारी, पोर्श, इतकंच नव्हे तर, मर्सिडिज गाडीही पाहायला मिळणार नाही. सर्वच विद्यार्थी सायकलवरून अथवा चालत येता-जाताना दिसतील. अगदी हसत-खेळत.

प्रश्‍न पोळीचा अथवा पिझ्झ्याचा नाहीच; महाराष्ट्रातले उच्चभ्रू लोक पुण्यात व नाशिकमध्ये पिझ्झा खातात आणि लंडनला सहलीसाठी गेले, की वीणा पाटील यांच्याकडं पुरणपोळीचा व मसालेभाताचा आग्रह धरतात!

प्रश्‍न हा आहे, की आपण ‘प्रगती’ कशाला  समजतो व ही ‘प्रगती’ करण्यासाठी सत्त्व हरवणं अत्यावश्‍यकच आहे का? जो समाज सत्त्व, निसर्ग व स्वाभिमान जपतो, तो समाज काही काळ आंतरराष्ट्रीय स्पर्धेत घसरला, तरी पुन्हा वर येतो. जो समाज स्वतःचं सत्त्व हरवण्यातच मोठेपणा समजतो, तो समाज कायम छोटाच राहतो!

Author  - संदीप वासलेकर

This post is taken from http://online3.esakal.com/. original post.

No comments:

Post a Comment

If you found any link not working, broken or removed by the third party website then please let me know via comments. I will find the solution as early as possible